साताराच्या नव्या भावी पिढीला सातारची ही जुनी ओळख...

पंचपाळी हौद

एका हौदात पाणी टाकलं तर ते बाजूच्या पाच हौदांत पोहचतं, अशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेचा भवानी पेठेतील पंचपाळी हौद ! छत्रपती शाहू महाराजांनी नवीन राजवाड्याच्या बांधकामाआधी साधारणपणे १८४७ -४८ साली हा हौद बांधला . सुरुवातीला वाड्याच्या नक्षीकामासाठी आणलेले सागवानी सोट या हौदात ठेवून करडईच्या तेलात भिजविले जात होते . कालांतराने हत्तींना पाणी पिण्यासाठी व धुणी धुण्यासाठी असे विविध वापर या हौदाचे झाले .  
 नवीन राजवाड्यांचे बांधकाम हाती घेण्याआधी मोठाले सागवानी सोट आणण्यात आले होते . हे सोट सुमारे वर्षभर या हौदात करडईच्या तेलात भिजत ठेवण्यात आले होते. या सोटांवर उत्तम नक्षीकाम करता यावे , हा यामागचा उद्देश होता. सध्या याठिकाणी दुर्गादेवीचे भव्य व आकर्षक मंदिर बांधण्यात आले आहे.

 
रामाचा गोट
'स्त्रीचा आदर करा, त्यांना सन्मानाने वागणूक द्या,' म्हणून स्त्रीवादी संघटना एकवीसाव्या शतकात एकवटल्या असल्या तरी सातारा येथील छत्रपती शाहू महाराजांनी सातार्‍यातील एका भागास कर्तबगार स्त्रीचे नाव बहाल करून आदर्श निर्माण केला होता . 'रामाऊंचा गोट' असे नाव एका भागाला मिळाले आणि अपभ्रंशाने आज आपण 'रामाचा गोट' या नावाने या परिसरास ओळखतो .
 
 
लंब्याच बोळ

प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी ऋणानुबंध आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदीच्या काळात त्यांना साथ मिळाली ती आप्पासाहेब लंबे यांची ! राजवाड्यापासून हाकेच्या अंतरावर राहणार्‍या लंबे यांचं घर त्याकाळी एकत्र जमण्यासाठी 'माईलस्टोन' म्हणून ओळखलं जायचं . पुढे पालिकेच्या रेकॉर्डवर हे घर आणि परिसर 'लंब्याचं बोळ' म्हणून नावारूपास आले .
सातारा शहरात १९३८ मध्ये जनार्दन मोडक यांनी मोडक केमिस्टची स्थापना केली . शहरातील हे ७५ वर्षे जुने मेडिकल दुकान लंबेंच्या शेजारचंच. आप्पासाहेब लंबे यांच्या सामाजिक क्षेत्राचा अवाका मोठा होता . म्हणून त्याकाळी अनेक दिग्गज व्यक्तींचा वावर या परिसरात होता.
याच परिसरात आप्पासाहेबांचे अन्य बंधू राहायचे . एका बोळाशेजारी लंबेंची तीन-चार घरे होती. या बोळाच्या शेवटच्या टोकावर एक देशी दारूचे दुकान सुरू झाले अन् पुढे या परिसराला 'लंब्याचं बोळ' हे नाव पडलं . पालिकेने पहिल्यांदा कागदावर या ठिकाणाचं बारसं केलं. पालिकेला येथे कोणतेही काम करायचे असेल तर कागदावर आणि परस्परांना सूचना देताना 'लंबेचं बोळ' लिहिलं, सांगितलं जाऊ लागलं . त्यानंतर अनेकांच्या तोंडी हेच नाव रूढ होत गेलं. खाया-पिया कुछ नही!
लंबे यांच्या घरात अनेकांचे व्यवसाय आहेत . पण हा बोळ ज्या कारणासाठी प्रसिध्द आहे , तो व्यवसाय लंबे यांच्यापैकी कोणीही करत नाही . पण 'लंब्याचं बोळं' नाव पडल्यामुळे अनेकांना लंबे याच व्यवसायात आहेत, असपासाहेब लंबे आणि त्यांचे कुटुंबीय आता पुण्यात स्थायिक झाले आहेत .

 
501 पाटी

एक पाटी' म्हणून ओळखला जाणारा सातारचा चौक हा खरं म्हणजे 'शनिवार चौक'. हे या चौकाचं बहुतेकांना माहीत असलेलं नाव . परंतु वास्तवात या चौकाचं खरं नाव आहे 'महात्मा गांधी चौक . ' परंतु जुन्या काळापासून सातारकरांना माहीत असलेलं नाव एकच .. पाचशे एक पाटी! या 'पाचशे एक पाटी'ची कथाही मोठी गमतीशीर आहे . 'पाचशे एक' नावाचा कपडे धुण्याचा साबण जेव्हा बाजारात सर्वप्रथम आला, त्याच वेळी या साबणाची जाहिरात होर्डिंगच्या स्वरूपात या चौकात उभारली गेली . त्यावेळी होर्डिंगच्या माध्यमातून जाहिरात करण्याची प्रथाही नव्यानंच आलेली ; त्यामुळं 'पाचशे एक' साबणाचं जितकं अप्रूप, तितकंच सातारकरांना या पाटीचंही अप्रूप वाटलं असणार, हे नक्की ! त्यामुळं हा चौक 'पाचशे एक पाटी' नावानंच ओळखला जाऊ लागला .

 
 
गुरुवार परज

परज हा भाग गुरुवार पेठेत येतो. त्यामुळे त्याला गुरुवार परज हे नाव पडले असावे. बक-याचा, धान्याचा बाजार, भाजी मंडई एकेकाळी भरायची ती गुरुवार परजावर... सिनेमा-तमाशाचे तंबू ठोकले जायचे तेही परजावर.., स्वातंत्र्यदरम्यानच्या काळात गुरुवार परजला फार महत्व होते. 1960 नंतर या मैदानावर शाळा आली. तसेच घरे बांधण्यात येऊ लागली. या ठिकाणी सध्या जुन्या कपड्यांचा बाजार भरत आहे.

 
कमानी हौद

शहाजी ऊर्फ अप्पासाहेब महाराज यांनी कमानी हौदाची निर्मिती केली. महाराजांकडे सतरा हत्ती होते, या हौदाच्या तिन्ही बाजूंनी कमानी आहेत. या कमानींची एकूण संख्या सतरा आहे. त्याकाळी एक-एक कमानीतून एक-एक हत्ती पाणी पिण्यासाठी येत असत.  शहरातील गुरुवार पेठेत असणा-या या हौदामुळे या परिसरास एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आजही हा पाण्याने भरलेला हौद आणि भव्या कमानी पाहिल्यानंतर आपणास इतिहासाची जाण होते.

 
वाघाची नळी

एकेकाळी अजिंक्यतारा किल्ल्यावरुन वाघ पाणी पिण्यासाठी शनिवार पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ येत होता, या अख्यायिकेवरुन शनिवार पेठेतील या ठिकाणाला सध्या वाघाची नळी म्हणून संबोधले जाते. अजिंक्यतारा पायथ्याशी थोरले प्रतापसिंह महाराजांनी सातारा शहरात विविध ठिकाणी पाण्याचे हौद बांधले होते. त्यामध्ये वाघाच्या नळीचा समावेश आहे.

 
तेली खड्डा

शनिवार पेठेतील तेली खड्डा परिसरात लिंगायत तेली समाजाची घरे मोठ्या प्रमाणावर होती. यातील प्रत्येक घरात एक तेलाचा घाणा होता. आता हे घाणे बंद झाले आहेत. तेली समाजाची घरे आणि तीव्र खड्डा यामुळे  परिसर तेली खड्डा या नावाने प्रसिध्द आहे. तेली खड्डा परिसर अनेक ऐतिहासिक, राजकीय घडामोडींचा साक्षीदार आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यातही येथील नागरिकांचा लक्षणीय सहभाग होता.

 
पंताचा गोट

सातारा शहरातील पंताचा गोट म्हणजे एक छोटेसे गावच आहे. पालिकेच्या हद्दीत ही पेठ असली तरी औंधच्या पंतप्रतिनिधींची त्यावर मालकी आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून याची पंताचा गोट अशी ओळख आहे.

 
जंगीवाडा

पीर जंगी साहेब यांच्या दर्ग्यामुळे प्रसिध्द असलेला मंगळवार पेठेतील जंगी वाडा हा केवळ वारसा नव्हे, तर लाखोंचे श्रद्धास्थानही आहे. हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्याच्या आणि अठरापगड जातींच्या श्रध्देचा धूप जेथे दरळतो, असे हे पवित्र स्थान. जंगी या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे मोठा, विशाल आणि दुसरा अर्थ म्हणजे जंग वर म्हणजे युध्दावर जाणरा, म्हणून जंगी. इमाम हुसैन-शहनशाह-ए-करबाला यांच्या स्मरणार्थ या वाड्यात मोहरमच्या महिन्यात ताबुताची स्थापना करण्यात येते. ऐंशी फूट लांब आणि पंचवीस फूट रुंद अशा या वाड्याला अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वींचा इतिहास आहे. पिराच्या पंजावरील तलवारीही खूप जुन्या आहेत. भक्कम दगडी जंगी वाड्यात शिसव आणि सागवानात केलेले कोरीवकाम, विशेषतः जाळीदार दरवाजा बघण्याजोगा आहे.

 
वरील भागावर जाण्यासाठी मला टिचकी द्या ---